पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ( दि.२३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. आदिवासी समुदायांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान सुरू केले जाईल, अशी घाेषणा सीतारामन यांनी केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,आदिवासी समुदायांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान सुरू केले जाईल.ही योजना आदिवासीबहुल गावे आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांतील आदिवासी कुटुंबांसाठी संपृक्तता कव्हरेज स्वीकारेल. यामुळे 5 कोटी आदिवासी लोकांना लाभ देणारी 63,000 गावे समाविष्ट होतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
अर्थमंत्र्यांनी रोजगार आणि कौशल्य निर्मितीसाठी पाच योजनांचे पीएम पॅकेज जाहीर केले. मोदी 3.0 सरकारने शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी दोन लाख कोटींची तरतूद केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, "अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे आम्ही देशातील गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित केले. शेतकऱ्यांसाठी, आम्ही सर्व प्रमुख पिकांसाठी उच्च किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. 80 कोटींहून अधिक लोकांना लाभ देणारी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवली आहे."