नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला निवडणूक होत आहे. यामध्ये भाजप ५ जागा लढण्याची शक्यता आहे. महायुतीमधील कोणता पक्ष किती जागा लढणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, भाजपमध्ये विविध नावे चर्चेत आहेत. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न यामध्ये भाजपचा असणार आहे. सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून देखील भाजपला विधान परिषदेसाठी नावे ठरवावी लागणार आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या ५ जागांसाठी ११ लोकांची नावे चर्चेत आहेत. भाजपच्या कोट्यातून पुन्हा एकदा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना संधी मिळणार आहे तर या ५ जागांमध्ये एका महिला नेत्यालाही संधी मिळणार आहे. महादेव जानकर वगळता ४ जागांसाठी तब्बल दहा नावे चर्चेत आहेत. या दहा नावांमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यातील माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नावांचाही भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर विचार सुरू आहे. सोबतच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री परिणय फुके, आमदार निलय नाईक, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजप नेते अमित गोरखे, माधवी नाईक यांचीही नावे चर्चेत आहेत.’ अशीही माहिती सुत्रांनी दिली.