नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly elections) मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्याशिवाय लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाराष्ट्राचे प्रभारी अश्विनी वैष्णव यांनीच स्पष्ट भूमिका व्यक्त केल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्याशिवाय लढली जाणार आहे. राज्याच्या दोर्या कोणाकडे, हे निवडणुकीनंतरच ठरवावे, अशी भाजपची भूमिका आहे. महायुतीचा चेहरा पंतप्रधान मोदी (Narendra Modi) हेच, तर मोहरा केंद्र सरकारच्या विविध विकास योजना हाच असणार असल्याचे पक्षाने निश्चित केले आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्याची घोषणा आधी न करताच महायुती (Mahayuti) निवडणूक लढवणार आहे. निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly elections) जाहीर झाल्यानंतरच मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात येते. मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर केले तर अंतर्गत नाराजीची भीती महायुतीला सतावते आहे. भाजपने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका आपल्या देहबोलीतून व्यक्त केली आहे. महायुती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या चेहर्यावर निवडणूक लढवणार आहे. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे महायुतीचे ध्येय असेल.
महायुतीमध्येही (Mahayuti) मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी सुरू आहे. भाजपमध्ये पक्षांतर्गतही या पदासाठी अनेक दावेदार आहेत. राज्यात काम करणार्या पक्षाच्या नेत्यांशिवाय केंद्रात काम करणार्या नेत्यांचाही यात समावेश आहे. याशिवाय युतीचे सहकारीही आपला दावा सोडण्यास तयार नाहीत. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करणे घातक ठरू शकते. यामुळे एकमेकांना पराभूत करण्याची स्पर्धा सुरू होण्याचा धोका आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते. भाजप ही परंपरा नेहमीच पाळत आलेला आहे. याआधीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली नव्हती.
- अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री, प्रभारी, महाराष्ट्र भाजप