

नवी दिल्ली : ‘कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या गुंडांनी माझे केस उपटले, मला ओरबाडले आणि बेदम मारहाण केली. दिल्ली पोलिसांनी वाचवले नसते, तर त्या लोकांनी मला जिवंत मारून टाकले असते, अशा शब्दांत बरखा त्रेहन यांनी दीपके यांच्यावर शाई फेकल्यानंतर त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची आपबीती रविवारी (दि. १९) कथन केली.
शनिवारी जंतरमंतर येथे आंदोलनस्थळी दीपके यांच्यावर शाईफेक करून बरखा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. नंतर त्यांनी एका व्हिडीओद्वारे शाई फेकण्याचे कारण स्पष्ट करत त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडले हे सांगितले. हे सांगताना त्या ढसाढसा रडू लागल्या.
बरखा त्रेहन म्हणाल्या, मी शांततापूर्ण आंदोलनाच्या अजिबात विरोधात नाही. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. सध्या 'कॉक्रोच' आणि त्यांची 'कॉक्रोच पार्टी' सहभागी असलेल्यांकडून जो कार्यक्रम सुरू आहे, त्याचा मूळ नीटच्या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. हा केवळ एका राजकीय अजेंड्याने प्रेरित कार्यक्रम आहे.
त्रेहन पुढे म्हणाल्या, अभिजितच्या गुंडांनी माझ्याशी कसे वर्तन केले याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. अभिजित आणि त्याचे साथीदार मंचावरच प्रभू श्रीराम आणि माता सीता यांची थट्टा उडवत होते. मी याचा निषेध करण्यासाठी अभिजितवर शाई फेकली. मला असे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले. मग त्या गोष्टी माता दुर्गा, माता काली किंवा प्रभू श्रीरामांबद्दल असोत, मी अशा गोष्टी कधीही खपवून घेणार नाही.