पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवाला एक महिन्यांचा कालावधी लाेटल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind kejriwal) हे मनशांतीसाठी पंजाबमध्ये पोहोचले आहेत. मंगळवारी सायंकाळी ते पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत पंजाबमधील होशियारपूरपासून सुमारे ११ किमी अंतरावर असलेल्या आनंदगड गावातील विपश्यना केंद्रात गेले. दरम्यान, केजरीवाल यांच्या ताफा आनंदगडला जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर 'आप'च्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल ( Swati Maliwal) यांनीही एक व्हिडिओ शेअर करत केजरीवालांवर हल्लाबोल केला आहे.
एकेकाळी 'व्हीआयपी' संस्कृतीला कडाडून विरोध करणारे अरविंद केजरीवाल मंगळवारी (दि.४) सायंकाळी विपश्यना शिबिरासाठी पंजाबमध्ये जात होते. यावेळी त्यांच्या पुढे आणि मागे वाहनांचा एक लांब ताफा दिसला. लाल आणि निळे दिवे असलेली अनेक वाहने होती. अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर विविध कमेंट पडत आहेत. आपच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनीही एक व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा केजरीवालांना धारेवर धरले.
स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. यामध्ये लिहिलं आहे की, "पंजाबमधील लाेकांनी केजरीवालजी या इतके प्रेम दिले तरी राज्यातील लोकांना ते इतके घाबरतात? व्हीआयपी संस्कृतीवरून संपूर्ण जगभर टीका करणारे केजरीवाल आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही मोठ्या सुरक्षा कवचात फिरत आहेत. पंजाबसारखे महान राज्य सर्वांना सुखसोयी पुरवण्याचे साधन कसे बनले आहे, हे आश्चर्यकारक आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे हे उल्लेखनीय आहे."
भाजप नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनीही केजरीवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर टीका केली. सिरसा म्हणाले, ' मंगळवारी (दि.४ मार्च) अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी पंजाबला पोहोचले. ते दृश्य पाहण्यासारखे होते. ५० हून अधिक वाहनांचा ताफा होता. २-२ कोटी रुपयांच्या गाड्या होत्या. १०० हून अधिक पोलिस कमांडो ड्युटीवर होते. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या होत्या. ते शांतता शोधण्यासाठी गेले होते. ही कसली शांतता आहे ज्यासाठी पंजाबच्या जनतेच्या तिजोरीतून लाखो रुपये वाया घालवले जात आहेत. संपूर्ण होशियारपूरला जागे केले जात आहे. या शांततेसाठी १०० कमांडो सुरक्षेसाठी बाहेर पडले आहेत? केजरीवाल हे राजकारणात वॅगनआरमध्ये आले होते. सत्ता मिळताच त्याचे खरे रंग दाखवले. आता त्याला विपश्यनेसाठीही १०० कमांडोची आवश्यकता आहे. ५० वाहनांचा ताफा आवश्यक आहे, असा टोलाही सिरसा यांनी लगावला आहे.
केजरीवाल यांनी यापूर्वी जयपूर, नागपूर, हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेजवळील धर्मकोट आणि बेंगळुरूसह अनेक ठिकाणी विपश्यना सत्रांना हजेरी लावली आहे. विपश्यना सत्रासाठी केजरीवाल पंजाबमधील आनंदगडला येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये येथे १० दिवसांच्या सत्रात हजेरी लावली होती.