पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जाहिरानामा शुक्रवारी प्रसिद्ध केला. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० हा इतिहास झाला असून ते पुन्हा कधीही लागू केले जाणार नाही, असे अमित शहा यांना स्पष्ट केले. (Article 370)
केंद्र सरकारने २०१९ला कलम ३७० रद्द केले. तर २०१४नंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामुळे या निवडणुकांना फार मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. येथील महत्त्वाचा पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेससोबत आघाडी केली असून राज्यात पुन्हा ३७० कलम लागू केले जाईल, असे आश्वासन दिलेले आहे.
शहा काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, "स्वातंत्र्यापासूनच भाजपसाठी जम्मू, काश्मी अत्यंत महत्त्वाचे राहिलेले आहे. हे प्रांत भारताशी जोडला जावा, यासाठी सातत्याने पक्षाने प्रयत्न केले आहेत. २०१४पर्यंत जम्मू काश्मीरवर सातत्याने फुटीरतावाद आणि दहशतवाद यांची सावली राहिली आहे. बरेच घटक होते, ज्यांनी जम्मू काश्मीरला अस्थिर करायचे प्रयत्न केले. त्यामुळे काश्मीरच्या इतिहासात २०१४ आणि २०२४ ही दोन वर्ष सुवर्ण अक्षरात नोंदवली जातील."
कलम ३७०च्या सावलीत हुरीयत कॉन्फरन्ससारख्या संघटनांपुढे सरकारला झुकावे लागत होते. गेल्या दहा वर्षांत कलम ३७० आणि ३५ - अ भूतकाळाचा भाग झाले आहेत. ते आता भारतीय घटनेचा भाग नाहीत, असे ते म्हणाले. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये विकासाचे पर्व सुरू झाले, त्यामुळे ते पुन्हा लागू केले जाणार नाही, असे ते म्हणाले.