

IPL 2026 Controversy
धर्मशाळा : पंजाब किंग्सचा (PBKS) वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि मुंबई इंडियन्सचा (MI) फलंदाज तिलक वर्मा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्नॅपचॅटवर (Snapchat) रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये अर्शदीपने तिलकला 'अंधेरे' (Andhere) असं म्हटलं आहे, ज्याचा अर्थ 'काळा' किंवा 'काळोख' असा होतो.यामुळे अर्शदीप सिंगवर नेटकऱ्यांकडून तीव्र टीका केली जात आहे. हा प्रकार गुरुवारी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२६ च्या सामन्यापूर्वी घडला. अर्शदीप अनेकदा सोशल मीडियावर व्लॉग्स, रील्स आणि इतर व्हिडिओ शेअर करत असतो. तिलक आणि अर्शदीप यांच्यात मैदानाबाहेर चांगली मैत्री आहे, हे सर्वांना माहीत असले तरी नेटकऱ्यांना अर्शदीपची ही भाषा अजिबात आवडलेली नाही. अनेक युजर्सनी अर्शदीपच्या या भाषेवर आक्षेप घेतला असून, या शब्दाला वंशद्वेषाची किनार असल्याचा आरोप केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंग, तिलक वर्मा आणि नमन धीर एकत्र दिसत आहेत. अर्शदीपने सुरुवातीला तिलकचा उल्लेख 'अंधेरे' असा केला. तिलकने आधी याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला; पण अर्शदीप तिथेच थांबला नाही. त्याने थट्टेने तिलकला 'सनस्क्रीन' वापरण्याचा सल्ला दिला. याच व्हिडिओत त्याने नमन धीरकडे बोट दाखवत त्याला पंजाबचा खरा 'नूर' म्हणजेच 'प्रकाश' म्हटले. नमन जेव्हा तिलकला या शब्दाचा अर्थ सांगत होता, तेव्हा तिलकने "मी आधीच सनस्क्रीन लावतो," असे उत्तर दिले.
अर्शदीपने हा संवाद मैत्रीपूर्ण आणि थट्टेच्या सुरात केला असला, तरी सोशल मीडियावर मात्र याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अनेक युजर्सनी अर्शदीपच्या या कमेंटला 'वंशद्वेषी' (Racist) ठरवत त्याच्यावर टीका केली आहे.
या घटनेमुळे क्रिकेटपटूंचे सोशल मीडियावरील वर्तन आणि विनोदाच्या मर्यादा यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच खेळाडूंच्या मैदानाबाहेरील वर्तनाबाबत कडक नियमावली जाहीर केली होती. एका आठवड्यापूर्वीच बीसीसीआयने आयपीएलमधील सर्व खेळाडू, व्यवस्थापक आणि सपोर्ट स्टाफसाठी एक सविस्तर 'अॅडव्हायझरी' जारी केली होती. यामध्ये सोशल मीडियाचा वापर, हॉटेलमधील वावर, पाहुण्यांशी संवाद आणि भ्रष्टाचारविरोधी प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही अर्शदीप पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
अर्शदीप आणि तिलक यांच्यातील ही घटना सामन्यच्या एक दिवस आधी घडली होती. मात्र, प्रत्यक्ष सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. पंजाबने दिलेले २०१ धावांचे आव्हान मुंबईने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली सहज पूर्ण केले. या विजयात तिलक वर्माने नाबाद ७५ धावांची (३३ चेंडू) तुफानी खेळी करत आपले वर्चस्व सिद्ध केले.दुसरीकडे, पंजाब किंग्सचा हा सलग पाचवा पराभव ठरला असून, प्ले-ऑफच्या शर्यतीतून त्यांचे नियंत्रण सुटले आहे. मैदानातील खराब कामगिरी आणि त्यातच मैदानाबाहेरील हे वाद, यामुळे पंजाबच्या अडचणीत वाढ झाली आहे.