

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम 124 मधील अधिकारांनुसार, या दोन्ही न्यायाधीशांची नियुक्ती केली असल्याचे केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने बुधवारी म्हटले.
25 ऑगस्ट रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती आलोक अराधे आणि विपुल पंचोली यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस केली होती. सरन्यायाधीश बी. आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने ही शिफारस केली होती.
दरम्यान, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी न्यायमूर्ती पंचोली यांच्या नियक्तीवर तीव्र विरोध दर्शवला होता. न्यायमूर्ती पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदी नियुक्ती न्यायव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरेल, असे न्यायमूर्ती नागरत्ना यांनी कॉलेजियमच्या बैठकीत म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले; पण न्यायमूर्ती नागरत्ना यांचा विरोध डावलून न्यायमूर्ती पंचोली यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात
आले.
न्यायमूर्ती आलोक अराधे सध्या मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आहेत. 2009 मध्ये त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. तर, 2011 मध्ये त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश करण्यात आले. तेव्हापासून त्यांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय, कर्नाटक उच्च न्यायालय, तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे. जानेवारी 2025 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाली.