

air india bhopal delhi flight makes emergency landing in jaipur due to engine failure
पुढारी ऑनलाईन : एअर इंडियाच्या या फ्लाइटने भोपाळच्या राजा भोज विमानतळावरून सकाळी 8:47 वाजता उड्डाण केले होते. या विमानाची निर्धारित उड्डाणाची वेळ सकाळी 8:25 वाजता होती. ठरलेल्या वेळेनुसार विमान सकाळी 9:55 वाजता दिल्लीला पोहोचणे अपेक्षित होते.
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI1886 या फ्लाइटमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान जयपूरकडे वळवण्यात आले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच विमान दिल्लीला नेण्याऐवजी खबरदारीचा उपाय म्हणून जयपूर इंटरनॅशनल विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एअर इंडियाच्या या फ्लाइटने भोपाळच्या राजा भोज विमानतळावरून सकाळी 8:47 वाजता उड्डाण केले होते. या विमानाची निर्धारित वेळ सकाळी 8:25 वाजता होती. ठरलेल्या वेळेनुसार विमान सकाळी 9:55 वाजता दिल्लीला उतरायचे होते.
उड्डाणादरम्यानच इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला आणि विमानाचा मार्ग जयपूरच्या दिशेने वळवला. जयपूर विमानतळावर आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सध्या ग्राउंड स्टाफ आणि एअरलाइनची तांत्रिक टीम विमानाची तपासणी करत आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्या सुरक्षा आणि स्थितीबाबत अधिकृत सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.
इंडिगो फ्लाइटचेही झाले होते इमर्जन्सी लँडिंग
यापूर्वी लखनऊहून सौदी अरेबियातील दम्मामला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E97 फ्लाइटला गुरुवारी संध्याकाळी बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. मात्र, विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
फ्लाइटने संध्याकाळी सुमारे 5:45 वाजता सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद विमानतळावर लँडिंग केले. विमानातील सर्व 107 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.
अहमदाबाद विमानतळ पोलिसांचे इन्स्पेक्टर एडी चावडा यांच्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान एका क्रू मेंबरला एक कागद सापडला होता, ज्यावर ‘बॉम्ब’ असे लिहिले होते. त्यानंतर पायलटने खबरदारीचा उपाय म्हणून विमान अहमदाबादकडे वळवले.
विमान अहमदाबादला पोहोचताच स्थानिक पोलीस आणि CISF यांनी तपासणी मोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत विमानाच्या आत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
काही दिवसांपूर्वीही घडला होता असाच प्रकार
यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी दम्मामहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटलाही बॉम्बच्या धमकीनंतर अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. विमानात 32 प्रवासी होते.
या प्रकरणातही एका क्रू मेंबरला एक टिश्यू पेपर सापडला होता, ज्यावर विमानात बॉम्ब असल्याचे लिहिले होते. तपासानंतर ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते.