'वक्फ' विधेयकाला न्यायालयात आव्हान देणार : 'एआयएमपीएलबी'चा निर्धार
पुढारी ऑनलाईन डेस्क : "वक्फ (दुरुस्ती) विधेयक (waqf amendment bill ) हा एक काळा कायदा आहे. हे विधेयक कनिष्ठ सभागृहाने मंजूर केला तर ते राज्यसभेत मांडले जाईल. आमची मालमत्ता हिसकावून घेण्यासाठी सुरु केलेला हा प्रयत्न आहे. हे स्वीकारता येईल का?, असा सवाल करत आम्ही पराभूत झालो आहोत असे समजू नका, आम्ही या विधेयकाला न्यायालयात आव्हान देणार आहोत, अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) चे प्रवक्ते डॉ. सय्यद कासिम रसूल इलियास यांनी आज (दि. २) पत्रकार परिषदेत दिली.
कायदा मागे घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही
संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मध्ये चर्चेदरम्यान या विधेयकाला विरोध करण्यात आला होता. आपण लढाई हरलो आहोत असे गृहीत धरू नये. आपण नुकतीच सुरुवात केली आहे. हा देश वाचवण्याचा लढा आहे. प्रस्तावित कायदा भारताच्या रचनेलाच धोका निर्माण करतो. सर्व जागरूक नागरिकांना विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन करत आम्ही न्यायालयात जाऊ. हा कायदा मागे घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही," असा निर्धार एआयएमपीएलबीचे एमडी अदीब यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणे देशव्यापी निदर्शने करु
आम्हाला देश वाचवायचा आहे म्हणून आम्ही हा लढा सुरू केला आहे. आम्ही शेतकऱ्यांप्रमाणेच देशभर आंदोलन करुन गरज पडल्यास रास्ता रोको करु आणि विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व शांततापूर्ण उपाययोजना करू," असे सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणे देशव्यापी निदर्शने करण्याचा इशाराही एआयएमपीएलबीचे प्रवक्ते मोहम्मद अली मोहसीन यांनी दिले.
ऑगस्ट २०२४मध्ये वक्फ (दुरुस्ती) विधेयक लोकसभेतसादर करण्यात आले होते. त्यानंतर ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले. फेब्रुवारी २०२५ मध्ये याचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला. केंद्रीय वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डांमध्ये गैर-मुस्लिम सदस्यांसाठी तरतूद समाविष्ट आहे. तसेच, वक्फ म्हणून ओळखली जाणारी कोणतीही सरकारी मालमत्ता वक्फ राहणार नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांची मालकी निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे, असा दावा केला आहे की विधेयकाची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या पॅनेलने विरोधी खासदारांनी मांडलेल्या सूचनांचा विचार केला नाही. त्यांनी केंद्रावर विधेयक घाईघाईने मांडल्याचा आरोपही केला आहे.
