![प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर होणार UAPA अंतर्गत कारवाई](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2FUntitled-design-T-.-1-149.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के सक्सेना यांनी सुप्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय आणि काश्मीर केंद्रीय विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन यांच्यावर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा अर्थात युएपीए अंतर्गत खटला चालवण्यासाठी मंजुरी दिली आहे. 'आझादी – एकमेव मार्ग' या बॅनरखाली आयोजित परिषदेत 'प्रक्षोभक' भाषण दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
त्यांनी 2010 मध्ये दिल्ली येथे झालेल्या परिषदेत खळबळजनक वक्तव्य केले होते. याप्रकरणी सुशील पंडित यांनी 28 ऑक्टोबर 2010 रोजी नवी दिल्ली येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान एक महिन्याभरात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लेखिका अरुंधती रॉय आणि काश्मीर केंद्रीय युनिव्हर्सिटीचे माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन यांनी 21 ऑक्टोबर 2010 रोजी नवी दिल्ली येथे 'आझादी – द ओन्ली वे' या बॅनरखाली आयोजित केलेल्या परिषदेत खळबळजनक आणि भडकावू भाषणे दिली होती. या परिषदेत चर्चा झालेल्या मुद्द्यांपैकी 'काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचा' प्रचार यांच्या भाषणातून करण्यात आला होता. या परिषदेत बोलणाऱ्यांमध्ये सय्यद अली शाह गिलानी, एसएआर गिलानी, अरुंधती रॉय, डॉ. शेख शौकत हुसेन यांचा समावेश होता.
गिलानी आणि अरुंधती रॉय यांनी काश्मीर कधीही भारताचा भाग नसल्याचा दावा केला होता. काश्मीर हा भारतीय सैन्याने जबरदस्तीने ताब्यात घेतला भूभाग आहे. जम्मू-काश्मीरला भारतापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले होते. या कार्यक्रमातील भाषणांवर सुशील पंडीत या याचिकाकर्त्याने आक्षेप घेतला होता. यासाठी त्याने परिषदेतील भाषणांचे रेकॉर्डिंग पोलिसांसमोर सादर केले होते.