

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) मोठा धक्का बसला आहे. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी (Abhijit Mukherjee) यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये (Congress) घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आजच (दि.१२) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे प्रभारी एआयसीसी सचिव असफ अली खान यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.
अभिजित यांचा संपूर्ण राज्यभऱात प्रभाव नसला तरी त्यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण त्यांच्याकडे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा राजकीय, सामाजिक वारसा आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने गमावलेला जनाधार पुन्हा मिळविण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांना चालना मिळू शकेल. २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी काँग्रेस खासदार अभिजीत यांचा पुन्हा काँग्रेस प्रवेश हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का मानला जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची स्थिती फारशी मजबूत नाही. २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा पक्षाने आपले स्थान भक्कम करण्याचा निर्धार केला आहे. तृणमूल काँग्रेसची मतपेढी ही मुळात काँग्रेसचा पारंपरिक आधार आहे. अनेक विधानसभा जागांवर अजूनही पक्षाची चांगली पकड आहे. आता आम्ही राज्यात पक्षाची पुनर्रचना करू आणि बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त लोकांमध्ये जाऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करू, असे खान म्हणाले.