

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले आहे. माना गावात झालेल्या या दुर्घटनेत ५७ कामगार बर्फाखाली अडकले आहेत. यातील १० कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
ही घटना बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) कॅम्पजवळील बद्रीनाथ धामपासून ३ किमी अंतरावर घडली. येथे कामगार रस्ते बांधणीचे काम करत होते. यादरम्यान मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले. यात ४७ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), जिल्हा प्रशासन, इंडो-तिबेटीयन सीमा पोलिस (ITBP) आणि बीआरओ पथके घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.
पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते पोलीस महानिरीक्षक नीलेश आनंद भरणे यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगतले की, "माना सीमा भागात बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन कॅम्पजवळ एक मोठे हिमस्खलन झाले आहे. येथे ५७ कामगार रस्ते बांधणीचे काम करत आहेत. यातील १० कामगारांना वाचवण्यात आले आहे. त्यांनी गंभीर परिस्थितीतून मानाजवळील लष्करी छावणीत पाठवण्यात आले आहे."
दरम्यान, बीआरओ (बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन)चे कार्यकारी अभियंता सीआर मीना म्हणाले की, घटनास्थळी ५७ कामगार होते. घटनास्थळी तीन ते चार रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. पण जोरदार हिमवृष्टीमुळे बचाव पथकाला तिथे पोहोचण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडसह अनेक डोंगराळ भागांसाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस (२० सेमी पर्यंत) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
''चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओकडून सुरू असलेल्या रस्ते बांधकामादरम्यान हिमस्खलन झाले. यात अनेक कामगार अडकल्याची दुःखद माहिती मिळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो.'' असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.