नवी दिल्ली : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Samelan) दिल्ली येथे होणार आहे. तब्बल सात दशकांनी प्रथमच मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. 'सरहद' संस्थेकडून साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे, यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. 'सरहद' संस्थेनेच २०१४ मध्ये पंजाबमधील घुमान येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते.
मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याने दिल्लीकर मराठी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि परिसरात ६ ते ७ लाख मराठी लोक राहतात. मराठी लोकांच्या अनेक सामाजिक संस्था दिल्लीत आहेत. दरम्यान, कमल पुष्प प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी यांनी साहित्य संमेलन आयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे संमेलन निश्चित संस्मरणीय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.