तीन वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांत 88 टक्के वाढ | पुढारी

तीन वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांत 88 टक्के वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात गेल्या तीन वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये 88 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना दिली.

2018-19 या आर्थिक वर्षात 2 लाख 32 हजार 602 कोटींचे डिजिटल व्यवहार झाले. 2019-20 मध्ये हे प्रमाण 3 लाख 40 हजार 25 कोटींपर्यंत पोहोचले, तर 4 लाख 37 हजार 445 कोटींचे डिजिटल व्यवहार 2020-21 मध्ये झाल्याचे डॉ. कराड म्हणाले.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पैसे देण्यासाठीचा भारताचा स्वतःचा मंच यूपीआयला डिजिटल पेमेंटसाठी आवडता मंच म्हणून देशाने पसंती दिली. वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये 22 अब्जांपेक्षा अधिक व्यवहार या मंचावर नोंदविला गेला. गेल्या तीन वर्षांमध्ये यूपीआयमध्ये चौपट वाढ दिसून आली आहे. शिवाय, वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये ‘आधार’आधारित अवलंबित पेमेंट प्रणालीने आंतर-बँक व्यवहारांमध्ये गेल्या चार वर्षांच्या तुलनेत नऊपटींनी वाढ झाल्याचे डॉ. कराड म्हणाले.

Back to top button