नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सौदी अरेबियातील मक्का येथे भारतातून हज यात्रेवर 1 लाख 75 हजार यात्रेकरू गेले होते. त्यापैकी आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी दिली आहे. अराफातच्या दिवशी जास्त तापमान असल्याने 6 हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
जायस्वाल म्हणाले की, नैसर्गिक आजार, जुने आजार आणि वृद्धापकाळामुळे काही लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये उष्माघाताचाही समावेश आाहे. अपघातात 4 भारतीयांचा मृत्यू झाला. मागील वर्षी हज यात्रेमध्ये मृत्यू झालेल्या भारतीयांची संख्या 187 होती.
तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांचा भारतात धार्मिक नेते म्हणून मोठा आदर असून त्यांच्याविषयी भारताच्या भूमिकेत कुठलाही बदल झाला नसल्याचे रणधीर जायस्वाल यांनी स्पष्ट केले. दलाई लामा हे धर्माच्या नावाखाली चीनमध्ये फुटीरवाद पसरवित असल्याचा आरोप चीनने केला होता. अमेरिका आणि भारताने दलाई लामा यांच्यापासून दूर रहावे, असे चीनने म्हटले होते. मात्र, भारताने चीनच्या भूमिकेचे खंडन करून दलाई लामा श्रेष्ठ धार्मिक नेते असल्याचे स्पष्ट केले आहे.