पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हवामान खात्याने यंदा तीव्र उन्हाळ्याचा इशारा दिला आहे. यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान तीव्र उष्णता असणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 'आयएमडी'चे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एप्रिल महिन्यात देशभरात सामान्य पाऊसही अपेक्षित आहे. उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका मध्य भाग, उत्तरेकडील मैदानी भाग आणि दक्षिण भारतातील अनेक भागांना बसणार असा अंदाज आहे. (IMD report)
महापात्रा म्हणाले, देशाच्या बहुतांश भागांमध्ये, विशेषत: मध्य भारत आणि पश्चिम द्वीपकल्पीय भारतामध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशातील काही भाग, उत्तर-पूर्व राज्ये आणि उत्तर ओडिशामध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेबद्दल महापात्रा म्हणाले की, देशातील बहुतांश मैदानी भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विविध भागात 10 ते 20 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे, तर साधारणपणे 4 ते 8 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी एप्रिल ते जून तापमानाचा अंदाज जाहीर करत असताना काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा तीव्र जाणवतील असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी गुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेची सर्वाधिक शक्यता असेल असा अंदाज वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या मते, एप्रिल आणि जून महिन्यांत पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य राज्ये आणि उत्तर ओडिशाच्या काही भागात कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, एप्रिलमध्ये देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, मध्य दक्षिण भारतात ही शक्यता अधिक आहे.
हेही वाचा