लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गठीत केली समिती
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने एक महत्वाची समिती गठीत केली आहे. काँग्रेसच्या या राष्ट्रीय आघाडी समितीत एकूण पाच सदस्य आहेत. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठका होत असताना काँग्रेसने पक्ष म्हणून स्वतःसाठी अशी समिती गठित करणे, लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.
या पाच सदस्यीय समितीमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक संयोजक आहेत. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी ही समिती महत्वाची असणार आहे.
काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात एक मोठी सभा पार पडणार आहे. या सभेसाठी काँग्रेसने नऊ सदस्यीय समिती गठित केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव असलेले आमदार पी सी विष्णूध, काझी निजामुद्दीन, संजय कपूर, धीरज गुर्जर, चंदन यादव, बी एम संदीप, चेतन चौहान, प्रदीप नर्वाल, अभिषेक दत्त यांचा यात समावेश आहे.