‘Donate for Desh’: कॉंग्रेसकडून देशव्यापी देणगी अभियान ‘डोनेट फॉर देश’ | पुढारी

'Donate for Desh': कॉंग्रेसकडून देशव्यापी देणगी अभियान ‘डोनेट फॉर देश’

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाला १३८ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमीत्ताने ‘डोनेट फॉर देश’ हे देणगी अभियान कॉंग्रेसकडून सुरु करण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी टिळक स्वराज कोष हे अभियान सुरु केले होते, त्यांच्या प्रेरणेतुन हे अभियान सुरु करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात १८ डिसेंबरला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. (Donate for Desh)

संघटनेत आलेली मरगळ आणि निवडणुकीत झालेला पराभव झटकण्यासाठी हा उपक्रम आहे. तसेच देशभरातील लोकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आणि पक्षाचा जनसंपर्क वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि कोषाध्यक्ष अजय माकन यांनी शनिवारी (१६ डिसेंबर) काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ‘डोनेट फॉर देश’ या अभियानात सहभागी होऊन लोकांनी देणगी द्यावी असे आवाहन के. सी. वेणुगोपाल यांनी केले. तसेच काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांनी याबद्दल विविध माध्यमाद्वारे जागृती करावी, असेही ते म्हणाले.  (Donate for Desh)

डिसेंबरपर्यंत हे अभियान ऑनलाईन असेल आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीनेही सुरू करण्यात येणार आहे. देशाच्या प्रत्येक बूथमधील किमान १० घरांमधुन किमान १३८ रुपये देणगी मिळेल, यासाठी पक्ष पदाधिकारी प्रयत्न करतील. तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी १३८० दान करा, असे आवाहन केले आहे. जी लोक दान देऊ शकतात असे देणगीदार शोधा असेही पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

या अभियानाबद्दल बोलताना काँग्रेस कोषाध्यक्ष अजय माकन म्हणाले की, पक्षाला १३८ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त या अभियानाद्वारे देणगीदात्यांना देणगी देता येईल. आहे. भारताचा नागरिक असलेला आणि वयाची १८ वर्ष पुर्ण केलेला व्यक्ती या अभियानाद्वारे दान करु शकतो. यातील प्रत्येक देणगीदात्याला काँग्रेस अध्यक्षांची स्वाक्षरी असलेले देणगी प्रमाणपत्र मिळणार आहे.

Donate for Desh : वर्धापन दिनानिमित्त नागपुरात सभा

काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमित्त २८ डिसेंबरला नागपुरात मोठी सभा पार पडणार आहे. देशभरातील काँग्रेस नेते या सभेला उपस्थित राहणार असून जवळपास १० लाख लोक येथे येणार असल्याचे के. सी. वेणूगोपाल म्हणाले. शुक्रवारी (१५ डिसेंबर)  यासंबधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीसोबत एक महत्वाची बैठक नागपुरात पार पडली, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

संसद सुरक्षा भंगाचे भाजपकडून राजकीयीकरण, काँग्रेसचा आरोप

विरोधी पक्ष संसद सुरक्षा भंगाचे राजकीयीकरण करत नाही तर देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजप या प्रकरणाचे राजकीयीकरण करत आहे. असा आरोप काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केला. संसद सुरक्षा भंग हा संसदेचा मुद्दा आहे त्यामुळे तो लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो असे भाजपने सांगितले. मात्र दिल्ली पोलीस न्यायालयात म्हणाले की, हा दहशतवादी हल्ला आहे, आणि दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत येते. संसद सुरक्षा भंग प्रकरण म्हणजे सुरक्षेतील गंभीर चूक आहे आणि सरकारच्या वतीने संसदेची इमारत ही जगातील सर्वात सुरक्षित इमारत आहे, असे सांगितले जाते, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

हेही वाचा 

Back to top button