Raut Vs BJP : ‘भाजपचा पराभव केला तरच पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होईल’ | पुढारी

Raut Vs BJP : 'भाजपचा पराभव केला तरच पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होईल'

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंधन दर कपातीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Raut Vs BJP)  यांनी केंद्र सरकारला चिमटे काढलेले आहेत. “राज्य सरकार दर वाढवत नाही. राज्य सरकार या महागाईविरोधात आहे. पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी करून काय होणार? किमान २५ रुपयांनी कमी करायला हवे होते. १०० रुपये वाढवायचे आणि त्यातील ५ रुपये कमी करायचे ही खेळी आहे. पेट्रोलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार आहे. इंधन दरवाढीतून कोट्यवधी रुपये कमविले”, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्रावर केली.

संजय राऊत (Raut Vs BJP) हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, “केंद्र सरकारचे मन मोठं नाही तर सडकं आहे. गेल्या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून केंद्रानं बेहिशोबी मालमत्ता कमवली.” पेट्रोल दरामध्ये तुटपुंजी कपात केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोदी सरकारवर टीका केली जात आहे. काॅंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीही ट्विट करून मोदी सरकारच्या इंधन दरकपातीवरून टीका केली आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, “सणासुदीचे दिवस सुरू आहे. पण, सामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. भाजप सरकारच्या लुटण्याचा या विचारवृत्तीमुळे सणापूर्वीच महागाई कमी करायचे सोडून गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, किराणामालाचे दर आकाशाची उंची गाठत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप १-२ रुपयांनी दर कमी करता, लोक तुम्हाला उत्तरे मागेल. सामान्य जनता तुम्हाला माफ करणार नाही. इंधन दर कपातीचा निर्यण मनापासून नाही तर भीतीतून घेण्यात आला आहे. या सरकारला निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल”, अशा आशयाचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.

Back to top button