पुढारी ऑनलाइन डेस्क : Biparjoy Cyclone : बिजरजॉय चक्रीवादळ काल रात्री साडे अकराच्या सुमारास गुजरातच्या जखाऊ बंदराला धडकले. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात किनारपट्टीवरील कच्छ, द्वारिका, मांडवी, जखाऊ या भागात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. तसेच कालपासून या भागात प्रचंड पाऊस सुरू आहे. याशिवाय अनेक भागात पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडपडीच्या तसेच विजेच्या तारा तुटणे, इत्यादी घटना घडल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने पूर्व तयारी करून आधीच लोकांना स्थलांतरीत केल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) गुजरातच्या किनाऱ्याला धडकल्यानंतर त्याचा वेग आता कमी झाला आहे. वाऱ्यांचा वेग आता ताशी 75 ते 85 किलोमीटर झाला आहे. चक्रीवादळामुळे कच्छच्या जखाऊ आणि मांडवीमध्ये अनेक झाड उन्मळून पडले. तसेच विजेच्या तारा आणि खांब देखील पडले आहे. एबीपी न्यूज हिंदीने दिलेल्या माहितीनुसार झाडपडीच्या घटनांमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. गुजरात पोलिस आणि बचाव दल द्वारका येथील पडलेले विजेचे खांब तुटलेल्या विजेच्या तारा, झाडे हटवण्याचे काम सुरू आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि ताशी 115-120 किलोमीटर वेगाने आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात कहर निर्माण केला, 300 हून अधिक विद्युत खांबांचे नुकसान झाले, चक्रीवादळ बिपरजॉय राज्याच्या किनारी भागात धडकल्यानंतर सुमारे 45 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला.
एएनआयने गुजरातमधील मांडवी आणि अन्य ठिकाणांवरील काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये झाडपडीच्या घटना, तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, काही ठिकाणी उडालेले पत्रे दिसत आहे. जोरदार वाऱ्याने विजेच्या तारा आणि खांब तुटल्याने मलिया तहसीलमधील ४५ गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. आम्ही 9 गावांमध्ये वीज पूर्ववत करत आहोत आणि उर्वरित गावांमध्ये वीज पूर्ववत करण्यात आली आहे: जे.सी. गोस्वामी, कार्यकारी अभियंता, पीजीव्हीसीएल, मोरबी
गुजरातचे मदत आयुक्त आलोक पांडे यांनी सांगितले की, वादळामुळे आतापर्यंत 22 लोक जखमी झाले असून 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आयएमडीचे संचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, चक्रीवादळ बिपरजॉय ईशान्येकडे सरकले आहे आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीला लागून असलेल्या सौराष्ट्र-कच्छला ओलांडले आहे. हे चक्रीवादळ आता समुद्रातून जमिनीवर सरकले असून ते सौराष्ट्र-कच्छच्या दिशेने केंद्रित झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडेल. पुढील चार दिवस पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा :