पुढारी ऑनलाईन डेस्क : G20 Summit : G20 परिषदेचे यजमानपद यावर्षी भारताला मिळाले आहे. त्यामुळे भारताने देशाच्या विविध भागात G20 च्या बैठका आयोजित केल्या आहेत. यामध्ये भारताला एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. G20 प्रतिनिधींची एक बैठक भारताने जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित केली आहे. चीन-पाकिस्तानच्या आवाहनाला धुडकावून लावत 17 देशातील 60 प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला. बैठकीत युरोपियन युनियनसह या देशांचा सहभाग म्हणजे जम्मू-काश्मीर हा त्यांच्यासाठी वादग्रस्त मुद्दा राहिलेला नाही, हे अधोरेखित झाले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये G20 ची बैठक आयोजित करणे हे भारताच्या राजनैतिक रणनीतीचा एक महत्वपूर्ण भाग मानला जात आहे. जम्मू-काश्मीरवरून भारत पाकिस्तानमध्ये वाद आहेत. त्यातच कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने या मुद्द्याचा वेळोवेळी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मांडले होते. त्यातच चीनने पाकिस्तानला साथ देऊन जम्मू काश्मीर वादग्रस्त भाग असून श्रीनगर येथील आयोजित G20 च्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.
चीनच्या या आवाहनावर भारताने कडक प्रतिक्रिया देऊन जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून देशाला भारताच्या कोणत्याही भागात बैठक बोलवण्याचा अधिकार आहे, असे ठणकावून सांगितले. G20 Summit
पाकिस्तानच्या अपप्रचाराला बळी न पडता तसेच चीनच्या आवाहनाला धुडकावून लावत जगातील 17 शक्तिशाली देशांतील 60 प्रतिनिधींनी जम्मू -काश्मीरमध्ये आयोजित G20 च्या बैठकीत सहभाग घेतला. जाणकार याला मोठे राजनैतिक यश मानत आहेत. या बैठकीमध्ये या देशांचा सहभाग म्हणजे जम्मू-काश्मीर हा त्यांच्यासाठी वादग्रस्त मुद्दा राहिलेला नाही, हे अधोरेखित झाले आहे.
या बैठकीत अमेरिका, रशिया, कॅनडा, युरोपियन युनियन, ब्रिटन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका यांसह 17 शक्तिशाली देशांतील 60 प्रतिनिधी सहभागी झाले होते. युरोपियन युनियनचा सहभाग अतिशय महत्त्वाचा मानत आहेत. कारण युरोपियन युनियनने राज्यातील कथित मानवी हक्क उल्लंघनावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तरीही युरोपियन युनियनने सहभाग घेतला, ही बाब विशेष महत्वाची मानली जात आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्या नंतरही या देशाच्या प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कोणतीही टाळाटाळ केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील G20 बैठकीत मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या धर्तीवर येथे हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे, असे उघडकीस आले होते.
मात्र,भारताने हा धोका लक्षात घेऊन कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. सुरक्षा दलात NSG, मरीन कमांडो आणि निमलष्करी दलाच्या अनेक कंपन्या आहेत. तसेच अनुचित घटना घडणार नाही, याचा विश्वास भारताने दिला. त्यामुळेच G20 बैठकीत प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
दरम्यान, पाकिस्तानने इस्लामिक राष्ट्रांच्या बैठकीत वारंवार हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तसेच सौदी अरबने ऐनवेळी बैठकीतून माघार घेतली. असे असले तरी दोन्ही देशांनी या बैठीक विरोधात कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. भारताने तुर्कस्तानमधील भूकंपावेळी ऑपरेशन दोस्त अंतर्गत केलेल्या मदतीमुळे तुर्कस्तानने या बैठकीत सहभाग घेतला नसला तरी भारतविरोधी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
हे ही वाचा :