Lakhimpur Kheri violence case : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आशिष मिश्रांना 8 आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर | पुढारी

Lakhimpur Kheri violence case : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आशिष मिश्रांना 8 आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर

पुढारी ऑनलाइन डेस्क : Lakhimpur Kheri violence case : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांना आठ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 2021 मध्ये उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलन सुरू असताना झालेल्या हिंसाचारात आशिष मिश्रा हे प्रमुख आरोपी आहेत. यामध्ये चार शेतक-यांना चिरडण्यात आले होते. अशोक मिश्रा हे केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचे पुत्र आहेत.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे के माहेश्वरी यांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला आणि सांगितले की, पीडितांच्या हक्कांचा समतोलही राखला जावा. “आम्ही या प्रकरणात कोणतेही मत मांडत नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांना काही अटी आणि शर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांना संबंधित न्यायालयाला त्यांच्या ठिकाणाची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच न्यायालयाने असेही स्पष्ट केले की आशिष मिश्रा किंवा त्यांच्या कुटुंबाने साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा आणि खटल्याला विलंब करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो.

Lakhimpur Kheri violence case : या व्यतिरिक्त दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या एनसीटीमध्ये राहण्यासाठी न्यायालयाकडून प्रतिबंध घालण्यात आला आहे. जामिनावर सुटल्यानंतर एक आठवड्यानंतर उत्तर प्रदेश सोडण्यास सांगितले आहे. तसेच सत्र न्यायालय हजर राहण्याचे आदेश देईल तेव्हाच आशिष उत्तर प्रदेशात येऊ शकतात.

आशिष मिश्रा यांच्यासह या प्रकरणातील इतर सर्व आरोपींनाही जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सत्र न्यायालय प्रत्येक सुनावणीनंतर या प्रकरणाचा सर्व तपशील सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवेल. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर लक्ष ठेवणार असून पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.

 

Back to top button