यूपीए काळात अमित शहांना तपास यंत्रणांनी खूप त्रास दिला | पुढारी

यूपीए काळात अमित शहांना तपास यंत्रणांनी खूप त्रास दिला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यूपीए सरकारच्या काळात तपास यंत्रणांकडून खूप त्रास दिला गेला, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात केले आहे. या अग्निपरीक्षेला शहा यांनी अत्यंत शांतपणे तोंड दिले, असे सांगताना सिंह यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या चौकशीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांवर अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला.

सोहराबुद्दीन शेख फेक एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना अनेक महिने तुरुंगवास भोगावा लागला, अनेक कटू प्रसंगांचा सामना करावा लागला, अशी आठवणही सिंह यांनी करून दिली. सोहराबुद्दीन शेख फेक एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 2002 साली झालेल्या गुजरात दंगलींवेळी मुख्यमंत्रिपदावर असणार्‍या नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अमित शहा यांच्या भाषणांवर आधारित ‘शब्दांश’ या पुस्तकाचे प्रकाशन राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. शहा यांना ‘नेपथ्य के नायक’ म्हणत. त्यांनी सक्षमपणे कर्तव्य पार पाडताना कधीही श्रेयवादासाठी चढाओढ केली नाही, असे सिंह म्हणाले. पडद्यामागे राहून शहा कुठल्याही लालसेशिवाय सरकार व पक्षासाठी काम करत असतात, अशी प्रशंसा करताना सिंह यांनी शहा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले.

Back to top button