कठुआ दहशतवादी हल्ला | 50 जणांच्या मुसक्या आवळल्या, 5000 गोळ्या झाडल्या - भारतीय लष्कराची धडक कारवाई
पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मूतील कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी आतापर्यंत 50 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले होते, तर 5 जवान जमखी झाले आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेची टीमही या प्रकरणी तपास करत आहे. भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफचे जवान या प्रकरणी तपास करत आहेत. हा परिसर अतिशय दुर्गम आणि जंगलाने व्यापलेला आहे. दहशतवाद्यांना पडकण्यासाठी पूर्ण शक्तीने कारवाई सुरू आहे, असे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
दहशतवाद्यांना आश्रय नको - लष्काराचा सज्जड दम
बाडनोटा या गावात हा दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवादी तीन गटात विभागले होते, आणि ते झाडीत लपले होते. भारतीय लष्कारची वाहने येथून जात असताना दहशतवाद्यांनी हातगोळे फेकले आणि मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. या प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैनिकांनी 5189 राऊंड फायर केले होते, त्यामुळे दहशतवाद्यांनी पलायन केले.
या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी काश्मिर टायगर्स या संघटनेने घेतली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पाठबळ काश्मीर टायगर्सना आहे. भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांना स्थानिकांनी मदत केली होती का याची चौकशी सुरू केली आहे. स्थानिकांनी दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये, अशा सक्त सूचना लष्कराने दिलेल्या आहेत.