पुढारी ऑनलाईन डेस्क: उन्हाळा सुरू झाला की देशातील अनेक भागात पाण्याची टंचाई भासू लागते. एप्रिल आणि मे असा दोन महिन्यांचा उन्हाळा अद्याप बाकी आहे. त्यामुळे टंचाईची समस्या पावसाळा सुरू होईपर्यंत अनेक ठिकाणी गंभीर होऊ शकते. एकीकडे असे चित्र असताना पावसाच्या पाण्याचे जतन, संवर्धनाचेही प्रयोग देशभरात होत असतात.
शनिवारी बंगळूरमधील एका व्यक्तीने अचानक झालेल्या पावसात केवळ 30 मिनिटांत 25000 लीटर पाणी साठवल्याचे समोर आले आहे. त्यांनी याचा व्हिडिओही X वरून शेअर केला आहे. त्यामुळे अनेक नेटिझन्सने त्यांच्यावर कौतूकाचा पाऊस पाडला आहे. (Bengaluru man harvests 25,000 litres of rainwater in 30 minutes)
बंगळूरमध्ये शनिवारी संध्याकाळी अचानक अवकाळी पाऊस झाला. यावेळी येथील कॅप्टन संतोष के. सी. यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीतून केवळ अर्ध्या तासात 25000 लीटर पाण्याचा साठा केल्याचा दावा केला आहे.
X (पूर्वीचे ट्विटर) बायोनुसार कॅप्टन संतोष के.सी. हे निवृत्त भारतीय सैन्य अधिकारी आहेत. त्यांनी X पोस्टमध्ये लिहिले आहे की, "बेंगळुरूतील पाऊस. शाश्वत नियोजनाची शक्ती. संध्याकाळच्या 30 मिनिटांच्या पावसात, आम्ही सुमारे 25000 लिटर पाणी संकलित केले. यातील 15000 लीटर घरगुती वापरासाठी आणि 10000 लीटर शेतीसाठी वापरण्यात येणार आहे.
कॅप्टन संतोष यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सेटअपही दिसून येतो. यात पाणी संकलनासाठी एक स्टोरेज टँक आणि पाईप नेटवर्क आहे.
सोशल मीडियावर एका युजरने त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत हा एक प्रेरणादायक उपक्रम असल्याचे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, अद्भुत. शेअर केल्याबद्दल धन्यवाद कॅप्टन." आणखी एकाने म्हटले आहे की, "छान पाऊल. तुम्हाला शुभेच्छा."
कॅप्टन संतोष यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत. एका युजरने त्यांना विचारले की, "तुम्ही पाणी स्वच्छ कसे ठेवता?" यावर संतोष म्हणाले की, "पावसाचे पाणी जिथे पडते आणिजिथून वाहत टाकीत येते तो पृष्ठभाग स्वच्छ आहे. त्यामुळे पाणी स्वच्छ आहे. घरगुती वापरासाठी पावसाचे पाणीही फिल्टर करून वापरले जाते. तर शेतीसाठी स्वच्छ पाणी गरजेचे नाही.
एका युजरने घरगुती आणि शेतीसाठीचे पाणी वेगळे कसे करता असे विचारले. त्यावर कॅप्टन संतोष यांनी सांगितले की, पाणी जमा होतानाच वेगवेगळे जमा होते. एक टँक 16 हजार लिटरचा आहे तर दुसरा 12 हजार लिटर टँकमधील पाणी शेतीसाठी वापरले जाते.
दरम्यान, शनिवार बंगळूरूमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती. भारतीय हवामान विभागा (IMD) च्या माहितीनुसार शहरात शनिवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० दरम्यान पाऊस आणि गारपीट झाली.