

पुढारी ऑनलाईन डेस्क : सक्तवसुली संचनालयाकडून (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बुधवार (दि.१) नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. आज (दि.३) पुन्हा ईडीकडून राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली असून १३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून याचा निषेध केला जात असून ईडीचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप अनेकजण करत आहेत.
१९ मे ला राहुल गांधी लंडनला एक कार्यक्रमासाठी गेले होते. ते ५ जून पर्यंत देशात परततील अशी शक्यता वर्तवली जात असून दोन दिवसांपूर्वीच्या नोटिशीला उत्तर देताना गांधी यांनी ईडीकडे आपण परदेशात असल्याने ५ जून नंतरची तारीख देण्याची विनंती केली होती. या अनुषंगाने ईडीने त्यांना १३ जून ला हजर राहण्यासाठीची नवीन नोटीस पाठवली आहे.
दरम्यान कोंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून घोषित केले आहे की, 'जी काँग्रेस ब्रिटिशांच्या अत्याचारापुढे नमली नाही ती ईडीच्या या कारवाईमुळे तुटणार नाही.' जर पैसेच हस्तांतरित झाले नाहीत तर मनी लॉन्ड्रींग कसे झाले असा सवाल करत हा निव्वळ काँग्रेसला बदनाम करण्याचा डाव असल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते व वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे.