तेजिंदरपाल बग्गा : 'हजारो गुन्हे दाखल करण्यात आले तरी केजरीवालांना प्रश्न विचारतच राहू'
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: आपल्याविरोधात हजारो गुन्हे दाखल करण्यात आले तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारतच राहू, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पंजाब पोलिसांकडून आपल्याला एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे अटक करण्यात आली होती, आरोपही बग्गा यांनी केला.
गेल्या आठवड्यात पंजाब पोलिसांनी दिल्लीत येऊन बग्गा यांना त्यांच्या राहत्या घरी अटक केली होती. त्यानंतर त्यांना पंजाबमध्ये नेले जात असताना हरियाणा पोलिसांनी त्या पथकाला आपल्या हद्दीत अडविले होते. पंजाब पोलिसांविरोधात बग्गा यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगत हरियाणा पोलिसांनी बग्गा यांचा ताबा दिल्ली पोलिसांकडे दिला होता. या साऱ्या घटनाक्रमावरून भाजप आणि आम आदमी पार्टी आमनेसामने आले होते. दरम्यानच्या काळात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने बग्गा यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता.
या साऱ्या पार्श्वभूमीवर बग्गा यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. गुरूग्रंथ साहिबचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे तसेच खलिस्तानी व ड्रग माफियाविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. प्रत्यक्षात केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून लोकांची फसवणूक केली असल्याचा आरोप बग्गा यांनी केला. या मुद्द्यावर आपण केजरीवाल यांना प्रश्न विचारतच राहू, भले हजारो गुन्हे दाखल करण्यात आले तरी चालतील, असेही बग्गा म्हणाले.
हेही वाचलंत का?
- ‘कवयित्री’ ममतादीदींना ‘साहित्य’ पुरस्कार!, प. बंगालमधील साहित्यिक भडकले
- बीड : शिवारातील ऊसाला तोड येईना, उसाला आग लावून ३२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
- पुण्याच्या महिला फौजदाराचा छळ ; साताऱ्यात सहा जणांवर गुन्हा
कॉल रेकॉर्ड : Google ने बॅन केले Call Recording चे Android App https://t.co/yXczDkHZQ3
— Pudhari (@pudharionline) May 11, 2022