

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, देशातील शेतकरी आंदोलने मोठ्या प्रमाणात होत आहेत. परंतु याचे कोणाला काहीही पडलेले नाही. धार्मिकतेच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचे काम काही संस्था करत आहेत. तसेच सध्या देश फक्त ४ लोक चालवत आहेत दोन विकत आहेत तर दोन व्यक्ती खरेदी करत आहेत. असे प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय (Arundahati raoy) यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय यांनी गुरुवारी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. पंजाब युनिव्हर्सिटीच्या सनी ओबेरॉय ऑडिटोरियममध्ये आयोजित एका कार्यक्रमात राय बोलत होत्या. त्यांनी देशातील प्रमुख मीडियासह काही संस्थांचा दुरुपयोग होत असल्याचीही खंत व्यक्त केली.
या देशाला सध्या 4 लोक चालवत आहेत, यातील सत्तेत असलेले दोघे विकत आहेत तर दोघे हे सगळे खरेदी करत आहेत. असे म्हणत राय यांनी सरकारवर टीका केली. सध्या देशात जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवण्यात येत आहेत. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, पण सध्या देशात हे होताना दिसत नाही. असे म्हणत धार्मिक संस्था आणि संघटनांवर ही राय यांनी टीका केली.
मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी जे आंदोलन केले त्यातून जगाला न्याय आणि हक्कासाठी कशारितीने लढतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न झाला. एखादे आंदोलन प्रामाणीक रितीने होत असेल तर सरकार विरोधात आपण डोळ्यात डोळे घालून लढू शकतो. अरुंधती राय यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देशातील दोन नामवंत उद्योजकांवर टीका केली. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यावर त्यांनी अप्रत्यतक्ष टीका केली.
दरम्यान, अरुंधती राय (Arundahati raoy) यांच्या युनिव्हर्सिटीतील कार्यक्रमाला येण्याचा विद्यार्थीनींच्या एका गटाने विरोध केला. राय यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत या विद्यार्थीनींनी घोषणा ही दिल्या.