

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मान्सूनच्या प्रलयंकारी पावसाने उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये हाहाकार माजवला आहे. जम्मूमध्ये पावसाने सुमारे 115 वर्षांचा विक्रम मोडला आहे, तर जम्मूमध्ये मंगळवारी सकाळी 8.30 पासून बुधवारी सकाळी 8.30 पर्यंतच्या 24 तासांत 296 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
या मुसळधार पावसाने 115 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी, 9 ऑगस्ट 1973 रोजी 272.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होता. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
पंजाबमध्ये अविरत पाऊस आणि धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. रावी आणि इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पुराचे सर्वात भीषण द़ृश्य गुरुदासपूरच्या दाबुरी येथील नवोदय विद्यालयात पाहायला मिळाले, जिथे 400 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक अडकून पडले आहेत. शाळेच्या तळमजल्यावर पाच फूट पाणी भरल्याने सर्वांना सुरक्षितपणे पहिल्या मजल्यावर हलवण्यात आले आहे. या विद्यार्थी आणि शिक्षकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि लष्कराची पथके घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे.