

जम्मू; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर प्रशासनाने राबविलेल्या १०० दिवसांच्या ‘नशामुक्त जम्मू-काश्मीर’ अभियानाला पहिल्या ६० दिवसांत लक्षणीय यश मिळाले आहे. प्रशासनाने हजारहून अधिक गुन्हे नोंदविले असून, १,१२८ संशयित तस्करांना अटक केली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिलच्या मध्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान जम्मू-काश्मीरभरात १०३६ एफआयआर नोंदविल्या आहेत. अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित १०० हून अधिक मालमत्ता जप्त किंवा ताब्यात घेतल्या आहेत. तस्करांविरोधात कठोर भूमिका घेत प्रशासनाने सुमारे ७०० वाहनचालक परवाने रद्द केले असून, १३० जणांचे पासपोर्ट रद्द करण्याची शिफारसही केली आहे.
मे महिनाअखेरपर्यंत ९२३ गुन्ह्यांची नोंद करून, १०१८ जणांना अटक केली होती. तसेच ३४१ किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात सुमारे १२ किलो हेरॉईन, गांजा, चरस, सायकोट्रॉपिक औषधांचा समावेश आहे. व्यसनमुक्ती केंद्रे मजबूत करण्याबरोबरच नवीन केंद्रे सुरू करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.