वाहनांमध्ये आगीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा बसवा! | पुढारी

वाहनांमध्ये आगीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा बसवा!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

प्रवासी गाड्यांमध्ये आगीची सूचना देणारी यंत्रणा आणि आग संरक्षक प्रणाली बसविण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय परिवहन मंत्रालयाने दिले आहेत. मंत्रालयाने यासंबंधी अधिसूचना काढली असून, यासाठी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड-135 (एआयएस) नुसार टाईप-तीनच्या वाहनांच्या रचनेमध्ये आणि बांधणीमध्ये सुधारणा करण्यात येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अशाप्रकारच्या टाईप-तीनच्या वाहनांचा उपयोग लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी केला जातो.

सध्या, एआयएस-135 नुसार इंजिनच्या भागामध्ये आग लागली, तर ते लक्षात येण्यासाठी गजर वाजवून सूचित केले जाते. इंजिनमध्ये बिघाड होऊन आग लागल्यानंतर प्रवाशांना ते असलेल्या भागात निर्माण झालेली प्रचंड उष्णता आणि धूर यामुळे जास्त दुखापत होते आणि त्रास होतो, असे प्रवासी गाड्यांना लागलेल्या आगींच्या कारणांचा आणि याप्रकारच्या अपघातांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले आहे. परंतु, यंत्रणेच्या कार्यान्वयामुळे प्रवासी गाडीला आग लागली, तर आत निर्माण झालेल्या उष्णतेचे व्यवस्थापन करून गाडीतल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी थोडा जास्त वेळ मिळू शकतो. तसेच उष्णता आणि धूर यांना नियंत्रित केले, तर प्रवासी जखमी होण्याचे प्रमाण कमी करता येईल, असा दावा मंत्रालयाने केला आहे.

यासाठी गाडीमध्ये पाण्याच्या वाफेवर आधारित सक्रिय अग्‍निसुरक्षा प्रणाली आणि गाड्यांसाठी वेगळी आगीची सूचना देणारी गजर यंत्रणा ज्या भागात प्रवासी आहेत, त्या भागात बसविणे आवश्यक आहे. गाड्यांची नवीन संरचना करावी लागणार आहे. या क्षेत्रातल्या संबंधित भागधारक आणि तज्ज्ञांबरोबर विचारविनिमय करण्यात आला आहे. यानुसार अग्‍निशमन तंत्रज्ञान, याविषयीचे जोखीम मूल्यांकन तसेच सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्न्मेंट सेफ्टी, ‘डीआरडीओ’ या संस्थेतील संबंधितांबरोबर चर्चा करण्यात आली आहे.

Back to top button