नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
पुणे शहराला पीएमपीएमएलसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून १ हजार नव्या ई-बस मिळाव्यात, या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिला. या प्रस्तावासंदर्भात पुणे शहरातील बसेसची आताची संख्या, आवश्यकता आणि भविष्यातील गरज, यासंदर्भात चर्चा केल्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, एच. डी. कुमारस्वामी यांनी सदर प्रस्तावावर कार्यवाही आणि प्रक्रिया करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ मध्ये आले, तसेच राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार राज्यात आल्यानंतर पुणे शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हायला सुरुवात झाली.
मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे मेट्रोची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर वनाज ते रामवाडी आणि पीसीएमसी ते स्वारगेट असे ३३ किलोमीटरचे दोन मार्ग १००% कार्यान्वित करत हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रोच्या कामाची सुरुवात केली. तसेच नुकतेच स्वारगेट-कात्रज या भूमिगत मार्गाचे भूमिपूजन झाले असून खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या दोन टप्प्यांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. एकीकडे मेट्रोचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे पीएमपीएमएलचे सक्षमीकरणही केंद्र सरकारच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. याचाच भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर पुणे शहराला मोदी सरकारच्या माध्यमातून ई-बसेस प्राप्त झाल्या. आजवर ४५० हून अधिक ई-बसेस मोदी सरकारच्या माध्यमातून पुणे शहराला मिळाल्या आहेत. आता दिलेल्या प्रस्तावावरही लवकरात लवकर कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि पुणे शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही मोहोळ म्हणाले.