

यवतमाळ : फिरण्यासाठी गेलेल्या आणि पोहण्याचा मोह आवरता न आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील टाकळी येथे आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. पियुष यादव, प्रथमेश यादव दोघेही रा. यवतमाळ, तर प्रसाद सातपुते (रा. बोरगाव पुंजी) असे तलावात बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
शहरातील जाजू विद्यालयातील सात ते आठ विद्यार्थी टाकळी तलाव परिसरात फेरफटका मारण्याकरिता गेले होते. यावेळी मुलांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. दरम्यान, पाच ते सहा जणांनी पाण्यात उड्या मारल्या. परंतु, अंदाज न आल्याने पाचही विद्यार्थी बुडत होते. नाकात, तोंडात पाणी गेल्याने गोंधळून गेलेल्या दोन विद्यार्थी प्रसंगावधान साधून बाहेर पडले. त्यातील एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
दुसर्याची प्रकृती स्थिर असून, उर्वरित तिघे पाण्यात बुडाल्याची माहिती सुखरूप बाहेर पडलेल्या मुलाने दिली. यामध्ये पियुष यादव, प्रथमेश यादव आणि प्रसाद सातपुते अशी पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी तसेच पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरवात केली. यानंतर उशिरा तिघांचे मृतदेह हाती लागले.
आठवड्याभरातील दुसरी घटना
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरापासून काही किलोमिटर अंतरावरील बोरगाव तलावात बुडून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. तर आज सोमवारी टाकळी तलावात तीन विद्यार्थी बुडाले. आठवड्याभरात ही दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.