

यवतमाळ : ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्त्वाचे दस्तऐवज लंपास करून जाळल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी रात्री पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथे घडला. विशेष म्हणजे सोमवारी ग्रामसभा असताना हा प्रकार घडल्याने भ्रष्टाचार दडपण्यासाठी केलेले हे कृत्य असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सायखेडा ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी गटविकास अधिकारी, कार्यपालन मुख्य अधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी केल्या होत्या. परंतु, या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. सोमवारी सकाळी ११:३० वाजता ग्रामसभा तसेच मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेमध्ये ग्रामपंचायतीत झालेल्या योजनेतील भ्रष्टाचाराबाबत गावकरी जाब विचारतील आणि भ्रष्टाचार उघडकीस येईल म्हणून आम ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच रात्री ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप फोडून तसेच आतील कपाट फोडून त्यातील महत्त्वाची कागदपत्रे लंपास करून ते बाहेर जाळण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी चौकशी करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पांढरकवडा गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना तक्रार पाठविण्यात आली आहे. या तक्रार अर्जावर संजय पवार, अशोक कनाके, विनोद मडावी, ऋत्विक पवार, अरविंद निमकर, संदेश मेश्राम, प्रीतम अनाके, निखिल धुर्वे यांच्यासह अनेक गावकऱ्यांच्या सह्या आहेत.