

यवतमाळ : सकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या मायलेकांवर अचानक अस्वलाने झडप घातली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. ही घटना आज बुधवारी घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी तांडा येथील शेतशिवारात घडली.
तारसिंग उत्तम जाधव (वय ४५) आणि त्यांची आई झालाबाई उत्तम जाधव (वय ६५) हे सकाळी शेतात गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यामुळे दोघांनीही आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सदस्य सहदेव राठोड यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच जखमींना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.