

यवतमाळ : एका बस चालकाने गंभीर आजाराच्या भीतीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. घाटंजी तालुक्यातील आमडी येथे ही घटना घडली. काही काळापासून कॅन्सरचे निदान झाल्याने मनावर आलेल्या ताणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
आमडी येथील रहिवासी व एसटी महामंडळाच्या पांढरकवडा आगारात कार्यरत चालक अनुप गिनगुले (वय 38) हे गुरुवारी (ता. 23) नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावरून घरी परतले होते. मात्र, घरी आल्यानंतर काही वेळातच ते थेट गावाबाहेरील शेताकडे गेले. रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास त्यांनी तेथे गळफास घेत आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अनुप यांना कॅन्सर झाल्याचे समजले होते.
या बातमीने ते पूर्णपणे हादरले होते. जगण्याची इच्छा असूनही आजाराच्या भीतीने त्यांच्या मनात नैराश्य पसरले होते. या मानसिक तणावातूनच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुप गिनगुले हे कर्तव्यदक्ष व सर्वांशी मिळून-मिसळून वागणारे कर्मचारी म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनामुळे आमडी गावात शोककळा पसरली असून, एसटी विभागातील सहकार्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि मोठा परिवार आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.