

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध सुरू केला आहे. सोमवारी (दि.९) बेलखेडच्या शेतकऱ्यांनी विरोध केला असताना आज पुन्हा करोडी आमला शेतशिवारात मोजणीसाठी गेलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी अडवले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
यावेळी पोलिसासमक्ष एका शेतकऱ्याने विषारी औषध घेण्याचा प्रयत्न केला तर काहीनी पैनगंगा नदीत आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्याला न जुमानता पोलिसांच्या उपस्थितीत मोजणी सुरू केल्याने एका शेतकरी महिलेसह सर्व शेतकरी आक्रमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिस वाहनात बसवुन उपविभागीय कार्यालयात आणण्यात आले. या सर्व परिस्थितीत प्रशासनाने मात्र, मोजणीची प्रक्रिया सुरू ठेवली.
उमरखेड तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गात सुपीक शेतजमिनी जात असल्याने तसेच शासनाकडून संभाव्य येणारी मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांतून विरोध होत आहे. शासन व प्रशासनाप्रती प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. काल सोमवारी बेलखेड शिवारात शेतकऱ्याची मुस्कटदाबी करून मोजणी प्रक्रिया पार पाडली. आज मंगळवारी करोडी, आमला शेतशिवारात सकाळी ११ वाजता मोजणी करण्यासाठी पथक पोहचले असता त्यांना अडवण्यात आले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
एका शेतकऱ्याने विषारी औषधाची बाटली घेताना ठाणेदारांनी त्याला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. तरीसुद्धा मोजणी सुरू केल्याने एक महिला शेतकरी आक्रमक झाली तिच्या समवेत सर्व शेतकरी मोजणी करत असलेल्या पथकाजवळ प्रचंड घोषणाबाजी करीत जाऊन धडकल्याने तसेच आत्महत्येची धमकी दिल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिस अधिकाऱ्याऱ्यांनी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना पोलिस वाहनात बसवून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात हजर केले. यावेळी सर्व शेतकरी यांच्यावतीने चितांगराव कदम यानी उपविभागीय अधिकारी यांना सर्व परिस्थिती कथन केली. जमिनीचे जे दर सुरू आहे त्यानुसार पैसे द्यावे, अन्यथा मोजणी झाली तरी आमच्या जमिनीचा ताबा घेऊ देणार नाही, असा खंबीर पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने यापुढेही प्रशासन व शेतकरी संघर्षाची चिन्ह दिसत आहे.