

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील कुऱ्हा (तळणी) येथील एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास तळणी येथे उघडकीस आली. मनोज दशरथ राठोड (वय ३७) रा. तळणी ता. आर्णी असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
तळणी येथे त्यांची शेती आहे. तो शिक्षित होता. काही वर्ष त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव पंजी येथे संगणक परिचालक म्हणून काम केले होते. त्यानंतर संगणक परिचालकाचे काम सोडून तो शेती करीत होता. उत्पादित मालाला भाव मिळत नसल्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढला. सततची नापिकी आणि व कर्जबाजारीपणामुळे त्याने जीवन संपविल्याची चर्चा परिसरात आहे. घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.