

यवतमाळ : वणी-वरोरा राज्य मार्गावर बुधवारी (दि. १५) दुपारी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की, कारने रस्त्याच्या कडेला दोन ते तीन पलट्या घेतल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वांजरी येथील प्रदीप रमेश ठमके (वय ३१) आणि मानकी येथील अनिल कुत्तरमारे (वय ४२) हे दोघे आपल्या दुचाकीने (क्र. MH 29 B 0963) शेंबाळाच्या दिशेने जात होते. दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारास वर्धा नदीवरील पाटाळा पुलाजवळ ते पोहोचले असता, मागून आलेल्या भरधाव कारने (क्र. MH 14 GD 6835) त्यांना उडवले.
या अपघातात प्रदीप ठमके यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अनिल कुत्तरमारे यांना गंभीर जखमी अवस्थेत वरोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली.
धडक दिल्यानंतर कारवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात दोन ते तीन वेळा उलटली. या घटनेत कारमधील तीन प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत. टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. कारमधील प्रवाशांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
या घटनेमुळे वांजरी आणि मानकी परिसरात शोककळा पसरली आहे. वणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.