

यवतमाळ : दोन मोकाट गाढवांच्या हल्ल्यात दुचाकीस्वार वडीलांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी शहरातील गोपाल कृष्ण मंदिरासमोर घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
किशोर बालमुकुंदजी पीपलवा (वय ६०) रा. पांढरकवडा, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. किशोल पीपलवा हे आपल्या मुलासह दुचाकीने घराकडे जात होते. दरम्यान, शहरातील गोपाल कृष्ण मंदिरासमोर दोन गाढवांची झुंज सुरू होती, यात बिथरलेल्या गाढवांनी अचानक त्यांच्या दुचाकीवाहनावर हल्ला चढविला. त्यामुळे दुचाकीवरील ते दोघेही रस्त्यावर खाली कोसळले. यामध्ये किशोर पीपलवा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.तर मुलाच्या हाताला जब्बर मार लागला. घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना तत्काळ उमरी येथे रुग्णालयात. दाखल केले. तेथे सिटीस्कॅन केले तेव्हा त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. प्रकृती गंभीर
असल्याने तत्काळ नागपूर दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नागपूर येथे डॉ. अग्रवाल यांच्याकडे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. त्यामुळे पुन्हा पीपलवा यांना उमरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवार दि. 19 सप्टेंबरला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाच्या मुलाने पोलिसात तक्रार दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे. या दुर्दैवी घटनेने पांढरकवडा शहरातील मोकाट जनावरांच्या नियंत्रण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेप्रकरणी मृतकाचा मुलगा राम किशोर पीपलवा यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर युवा टायगर फोर्सनेही पोलिसांकडे निवेदन दिले. घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधितांची कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेतला नाही. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्यासाठी ठोस कार्यवाही झाली नाही, तर युवा टायगर फोर्सच्या नेतृत्वात शहरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल,' असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.