

यवतमाळ : रेतीने भरलेल्या भरधाव टिप्परची जबर धडक बसल्याने दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. महागाव तालुक्यातील हिवरा संगमजवळ ही भीषण घटना आज शनिवारी दुपारी घडली. मागील तीन दिवसांत या परिसरात तिघांचे बळी गेल्याने नागरिकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यातील अंबोडा येथील रहिवासी देवानंद दोडके (वय १९) आणि शुभम पाटे (वय १८) हे दोन मित्र आपल्या एमएच २९ सीएफ ८७९९ क्रमांकाच्या दुचाकीने माहूरकडे जात होते. हिवरा संगम येथील अरुंद मार्गावर विरुद्ध दिशेने रेती घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी टिप्परमध्ये शिरुन मागील बाजूला अडकली. नियंत्रण सुटल्याने टिप्पर रस्त्यालगतच्या नालीत जाऊन पलटी झाला.
या अपघातात देवानंदचा मृत्यू झाला तर शुभम गंभीर जखमी झाला. अपघात घडताच स्थानिक तरुणांनी तातडीने धाव घेत शुभमला बाहेर काढले. त्याला प्रथम माहूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळला रेफर करण्यात आले. दुर्दैवाने, वाटेतच शुभमचा मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. घटनेची माहिती मिळताच महागावचे ठाणेदार धनराज निळे, महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पीएसआय किशोर गवई आणि त्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.