सततच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाची परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे उत्पन्न घटण्याचा मोठा धोका वाढला आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी, यवतमाळ जिल्हा किसान काँग्रेस आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दली. शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. याविषयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी.
कर्जाच्या खाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी
कर्जाच्या खाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. खरीप हंगामातील पात्र शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज वाटप करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी असणारे पांदण रस्ते तत्काळ पूर्ण करण्यात यावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. यावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी आहे. यावेळी निवेदन सादर करताना शहर अध्यक्ष चंदू चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, अशोक बोबडे, जावेद अनसारी, अरविंद वाढोणकर, प्रा. घनश्याम दरणे, विलास देशपांडे, दिनेश गोगरकर, राजू चांदेकर, अनिल गायकवाड, अॅड. वैभव पंडित, अरुण ठाकूर, संजय वाळके, मीनाक्षी सावळकर यांच्यासह अनेकजन यावेळी उपस्थित होते.
तीन प्रकल्पाचे दरवाजे उघडले
सततच्या पावसाने जलप्रकल्प ओव्हर फ्लो होत आहे, तर काही जलाशात क्षमतेपेक्षा अधिक साठा निर्माण होत असल्याने बेंबळा, अधरपूस आणि अडाण प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आहे आहे, तर काही प्रकल्पात १०० टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. यामध्ये मोठा पूस, गोकी, वाघाडी, सायखेडा, बोरगाव या प्रकल्पाचा समावेश आहे.

