यवतमाळ : पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावंडाचा मृत्यू
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अरमान खान शहीद खान (वय १३) आणि झियान खान शहीद खान (वय ११) रा. शांती नगर, वडगाव अशी मृत भावंडांची नावे आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वडगाव परिसरातील दोन अल्पवयीन भावंडे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्या दोघांचा कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळून आले नाही. अखेर त्या मुलांच्या आईने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. अशात शनिवारी सायंकाळी आर्णी मार्गावरील एलिमेंट मॉलच्या बाजूला असलेल्या रेल्वे पुलाखालील पाण्यात त्या दोन्ही भावंडांचे मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळून आले. माहिती मिळताच अवधूतवाडी ठाणेदार नरेश रणधीर यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या दोन्ही भावंडाचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणी करता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.