

वाशीम : वाशीम तालुक्यातील टनका (पोस्ट जयपूर) येथे दारूच्या नशेत काही व्यक्तींनी एका कुटुंबावर हल्ला करून मारहाण व तोडफोड केल्याची गंभीर घटना 29 एप्रिल रोजी घडली. या हल्ल्यात लहान मुलांसह कुटुंबातील सदस्य जखमी झाले असून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सूर्यभान शिंदे हे शेतातील कामासाठी गेले असताना सायंकाळी सुमारे ११.३० वाजता सत्यपाल घवरे यांनी दारूच्या नशेत त्यांची गाडी अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर रात्री सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान ५० ते ६० जणांच्या जमावाने शिंदे यांच्या घरावर हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी घरातील दरवाजे, खिडक्या व कूलरसह अन्य वस्तूंची तोडफोड केली. तसेच घरातील महिलांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेत लहान मुलांनाही दुखापत झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यामुळे घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे १.५० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.