

वाशिम : जिल्ह्यात विविध यात्रा, सण-उत्सव तसेच दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अंमलात राहणार आहेत.
सध्या जिल्ह्यात श्री बिरबलनाथ महाराज यात्रा उत्सव सुरू असून तो १४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तसेच १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री, श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंती, १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती (शासकीय) उत्सव आणि दहावी-बारावीच्या परीक्षांचा कालावधी लक्षात घेता संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे आदेश आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी कळविले होते.
आदेशानुसार शस्त्रे, काठ्या, तलवारी, सुरे, बंदुका तसेच इतर घातक किंवा तीक्ष्ण वस्तू बाळगण्यास, दाहक व स्फोटक पदार्थ वाहून नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दगडफेक करण्यासाठी वापरली जाणारी साधने जवळ बाळगणे, बिभत्स स्वरूपाचे प्रदर्शन करणे, प्रक्षोभक घोषणा देणे, आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा शांततेस बाधा येईल असे कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव अथवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र कर्तव्यावरील पोलीस अधिकारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेले कार्यक्रम या आदेशातून वगळण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.