

वाशिम : जिल्ह्यातील शिरपूर जैन पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या तिवळी गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या दोन निष्पाप लहान मुलांचे मृतदेह शेतात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे तिवळी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
१३ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तिवळी येथील बकाल यांच्या स्वतःच्या शेतात हे मृतदेह आढळून आले आहेत. मृतकामध्ये संतोष तुकाराम बकाल (वय ३८) - यांचा मृतदेह शेतातील विद्युत टॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर वर्षा संतोष बकाल (वय अंदाजे ३४) - यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. तसचे जान्हवी संतोष बकाल (मुलगी, वय अंदाजे ७) - या चिमुरडीचा मृतदेह विहिरीत आढळला असून तिचे हात आणि पाय बांधलेले होते. सोहम संतोष बकाल (मुलगा, वय अंदाजे ६) - या चिमुरड्याचा मृतदेह विहिरीत आढळला असून त्याचेही हात-पाय बांधलेले होते.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून तिन्ही मृतदेह बाहेर काढले. शिरपूर पोलिसांकडून घटनास्थळाचा कसून पंचनामा करण्यात आला असून, सर्व मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शिरपूर जैन पोलिस स्टेशनचे पोलिस पथक या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच पुढील वस्तुस्थिती स्पष्ट होईल.