

Gondegaon child death
वाशिम: तालुक्यातील ग्राम गोंडेगाव येथे ग्रामपंचायतच्या उघड्या नाल्यात बुडुन मृत्युमुखी पडलेल्या ३ वर्षीय स्वराजच्या दुर्देवी मृत्यु प्रकरणी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी व सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह पीडितांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजु पाटील किडसे व जिल्हा सचिव तथा वाहतुक सेना जिल्हा उपाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन सोपविण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, वाशिम तालुक्यातील मौजे गोंडेगाव येथे १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान स्वराज्य अशोक खिल्लारे हा मुलगा खेळता खेळता नालीतील पाण्यात पडला. व बुडुन मरण पावला. सदर नाली ही ग्रामपंचायतच्या मालकीची असून ही नाली बांधून एक वर्ष पूर्ण झाले आहे. व अद्यापही सदर नाल्यावर धापे बांधण्यात आलेले नाहीत तर काही नाल्यावर अर्धवट धापे बांधण्यात आले आहेत.
काल दि. १७ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसामुळे हा नाला पाण्याने तुडुंब भरला आहे. घडलेली दुर्घटना ही केवळ ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडलेली असून या घटनेत एका मातेचा लहान मुलगा हा मरण पावला आहे. त्या आईचा एकुलता एक आधार गमावल्या गेलेला आहे. तरी या घटनेता अक्षम्य बेपवाई, बेजबाबदारपणा व दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्देवी घटना घडली असून यात दोषी असलेले सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी.
तसेच मृताच्या आईवडिलांना त्वरीत भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. या दुदर्वी घटनेमध्ये मृत बालकांच्या परिवाराला न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.