वाशिम : वाशिमच्या बाभूळगाव येथील १४ वर्षीय मुलाचे बुधवारी (दि.१२) रात्री १० वाजता अपहरण झाले. ३६ उलटून गेले तरीही मुलाचा शोध न लागल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. अनिकेत सादुडे (वय १४) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल नऊ पथके तयार केली असून गावकऱ्यांचीही कसून चौकशी सुरू आहे. साधारण एक वर्षांपूर्वी या मुलाच्या वडिलांनी आपली रोडलगतची शेती विकली होती. त्यातून त्यांना दीड कोटी रुपये मिळाले होते. कदाचित या पैशामुळेच मुलाचं अपहरण झालं असावं, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान अनिकेत हा गावामध्येच असलेल्या नानमुखाच्या कार्यक्रमानिमित्त निघालेल्या वरातीत नाचण्यासाठी गेला होता. मात्र कार्यक्रम संपूनही उशिरापर्यंत तो घरी परत न आल्यानं त्याच्या वडिलांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला. तो मिळून न आल्याने ते घरी परतले. त्यावेळी त्यांच्या दारासमोर त्यांना एक बंद लिफाफा मिळाला. ज्यामध्ये मुलाचं अपहरण झालं असून त्याला सोडायचं असल्यास ६० लाख रुपये खंडणी द्या, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला होता.