वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तीन विद्यार्थिनींचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१५) घडली. या घटनेमुळे हिंगणघाट शहरात शोककळा पसरली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिसबा जावेद शेख (वय १७, रा. संत चोखोबा वॉर्ड, आरोही अनुप चवरे (वय १६, रा. महात्मा फुले वॉर्ड, समृद्धी रूपक धामसे (वय १६) रा. संत गोमाजी वॉर्ड हिंगणघाट या तीन विद्यार्थिनी (एम एच ३२, ए डब्ल्यू ५७७९) क्रमांकाच्या दुचाकीने जात होत्या. दरम्यान दुचाकीचा ट्रॅव्हलसोबत अपघात घडला. या अपघातात तिघींचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. अपघातग्रस्त दुचाकी आणि ट्रॅव्हल पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. घटनेनंतर अपघातस्थळी व त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात मृतांच्या कुटुंबियांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. तेथे मृत विद्यार्थिनीचे पालक व नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी तक्रारीवरून नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.